दि. २३ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ६ वाजता बुलडाणा शहर पोलिस ठाण्यात गणेश उत्सव स्थापना व ईद मिलादुन्नबी या दोनही मोठ्या धार्मिक सणांच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती.
या बैठकीस शांतता समितीचे सदस्य, पदाधिकारी तसेच मुस्लिम महासेवा संघाचे महाराष्ट्र राज्य सचिव असलम शाह यांना विशेष निमंत्रित करण्यात आले होते. हिंदू-मुस्लिम एकतेचा उत्तम संदेश या बैठकीतून देण्यात आला.
बैठकीदरम्यान सर्व उपस्थित मान्यवर व तरुणांना काही महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या. आगामी गणेश मूर्ती विसर्जन व ईद मिलादुन्नबीच्या मिरवणुका मोठ्या शांततेत, संयमाने व परस्पर सन्मान राखत पार पडाव्यात, यावर भर देण्यात आला. आपल्या कार्यक्रमांमुळे इतर समाजातील लोकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन करण्यात आले.
डीसीपी साहेबांनी आपल्या भाषणात सांगितले की, गुलालाचा वापर टाळून फुलांचा वापर केल्यास चांगला संदेश जाईल. गुलालामध्ये केमिकल असल्याने डोळ्यांना व त्वचेला त्रास होण्याचा धोका असतो. त्यामुळे सजगता बाळगून सर्वांनी उत्सव साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले.
या बैठकीत दिलेल्या मार्गदर्शनामुळे शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा उत्तम संदेश गेला असून, येणारे सण उत्साहात व शांततेत पार पडतील असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
