जळगाव : जळगावच्या विमानतळावर रात्रपाळीलाही विमानसेवा देणारी यंत्रणा सज्ज आहे. तरीही ही सेवा बंद असल्याने औद्योगिक वसाहतीसह जिल्ह्यातील उद्योग, व्यवसायासाठी अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे जळगाव स्थानकावर पुण्याकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना थांबे द्यावेत आणि विमानसेवा तत्काळ सुरू करावी यादृष्टीने केलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. 'स्टार एअर'च्या माध्यमातून येत्या फेब्रुवारीपासून मुंबई, अहमदाबाद इंदौर व पुण्यासाठी विमानसेवा सुरू होणार असल्याची माहिती महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरचे अध्यक्ष ललित गांधी यांनी गुरुवारी येथे दिली.
राज्यातील ३६ जिल्ह्यात उद्योग व्यवसाय, शेतीपूरक व्यवसाय व शेत उत्पादनांची बाजारपेठ विस्ताराव. आणि त्यांना व्यासपीठ मिळावे, यासाठी चेंबर्स ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रीकल्चरच्या वतीने जिल्हानिहाय आढावा घेतला जात आहे. त्यानिमित्ताने गांधी हे जळगाव दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील उद्योजक, व्यावसायिक, शेतकरी प्रतिनिधींची त्यांनी गुरुवारी बैठक घेतली. तत्पूर्वी ते पत्रकारांशी बोलत होते. त्यावेळी त्यांनी ही माहिती दिली. महिला उद्योजकता समितीच्या अध्यक्षा संगीता पाटील, समितीचे सदस्य दिलीप गांधी, नितीन इंगळे यावेळी उपस्थित होते.
महिला व युवकांसाठी अभियान
महिला व युवकांना उद्योग, व्यावसायिक क्षेत्रात आणण्यासाठी राज्यभरात महिला उद्योजकता अभियान व उद्योग वृद्धी यात्रा अभियान राबविण्यात येणार आहे. तसेच राज्यात जिल्हानिहाय 'डेव्हलपमेंट फोरम'चे कार्यालय स्थापन करून उद्योग वाढीदरम्यान येणाऱ्या अडचणींचा आढावा घेतला जाणार आहे. हा एकत्रित आडावा राज्य व केंद्र सरकारकडे सादर करण्यात येणार आहे.
पुण्याकडे जाण्यासाठी रेल्वेगाड्या
पुण्याकडे जाण्यासाठी जळगाव येथे थांबा असणाच्या रेल्वेगाड्यांची संख्या कमी आहे.. त्यामुळे अन्य गाड्यांनाही थांबा मिळावा, यासाठी चेंबर ऑफ कॉमर्सने पाठपुरावा केला. त्यानुसार दुरांतो, गरीबरथ, दाणापूर-पुणे व हमसफर एक्स्प्रेस या रेल्वेगाड्यांना लवकरच जळगाव स्थानकावर थांबा मिळणार आहे.


.jpg)