*
भुसावळ : शहरातील रविवारच्या आठवडे बाजारात होणार्या गर्दीनंतर होणारी वाहतूक कोंडी पाहता पोलिस प्रशासनाने रविवारी सकाळी अप्सरा चौकातील हातगाडी चालकांना मागे सरकण्यास सांगत दुकानांच्या बाहेर लावलेली वाहन हटवण्याचे आदेश देत व्यापार्यांनी लावलेले लोखंडी अँगलही जप्त केल्याने व्यापार्यांनी संतप्त पवित्रा घेत दुकाने बंद केली. या संदर्भात वरीष्ठ स्तरावर तक्रारीचा निर्णय झाला मात्र दुपारनंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यापार्यांचे भेट घेत या प्रश्नी तोडगा काढण्याचे व मुख्याधिकारी गुरुवारी आल्यानंतर बैठक घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर व्यापार्यांनी रविवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास दुकाने सुरू केली.
वाहतूक कोंडी शहरवासी त्रस्त
शहरातील अप्सरा चौकातील शंभर फुटी रस्त्यावर हातगाडी धारकांनी अतिक्रमण केल्याने त्यामुळे इथून जा-ये करताना वाहनधारकांना व पादचार्यांना अतिशय त्रास सहन करावा लागत होता. ही बाब लक्षात घेता पोलिस प्रशासनाने व्यापारी संकुलाच्या दुकानांसमोरील वाहने हटवून हातगाडी धारकांना दुकानांच्या समोर ठेले लावण्याचे आदेश रविवारी सकाळी दिल्यानंतर व्यापारी प्रचंड संतापले व त्यांनी लागलीच पोलिस प्रशासनाच्या कृतीविरोधात दुकाने बंद केली.
पोलिस उपअधीक्षकांनी काढली समजूत
दुपारनंतर पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी व्यापार्यांची भेट घेत घडलेला प्रकार जाणून घेतला तसेच या संदर्भात तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. मुख्याधिकारी संदीप चिद्रवार हे रजेवर असून ते गुरुवारी आल्यानंतर व्यापार्यांची बैठक घेण्यात येईल व त्यांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात येईल, असे तोंडी आश्वासन यावेळी व्यापार्यांनी दिल्यानंतर तूर्त दुकाने व्यापार्यांनी उघडली आहेत.
